भावकीत भांडणं नको | शेतजमिनीसाठी पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा

 ग्रामीण भागात सर्वत्र शेतजमिनीवरून भावकीत नेहमीच तंटे आणि भांडणं पाहायला मिळतात. अनेकांच्या जमिनी याच कारणांमुळे पडीक होऊन राहिल्या आहेत. अनेक एकत्रित कुटुंबात याच कारणामुळे घरातील भांडणं विकोपाला गेल्याच देखील अगदी सहज पाहायला मिळतं. मात्र आता यावर एक आनंदाची बातमी आहे आणि ती देखील सरकारी आणि प्रशासन पातळीवरून.



शेतजमिनीच्या वादातून होणाऱ्या भांडणाचे कारण ठरणाऱ्या पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा तयार केले जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने (Maha Bhulekh Satbara Utara) यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत. तसेच त्यांचे स्वतंत्र नकाशे तयार केले जाणार आहेत. या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा अभिलेखावर बहीण भावांची तसेच सहहिस्सेदारांची नावे असतात. सातबारावरील नावानुसार प्रत्येकाचा हिस्सा निश्‍चित असतो. त्यानुसार वाटणी होऊन जमीन ताब्यात जाते. वाटणी झालेल्या जमिनीनुसार वहिवाटही असते. परंतु, अनेकदा सातबारा एकच असल्यामुळे पोटहिस्यावरून भांडणे होतात. असे वाद कोर्टात देखील जातात. तथापि, पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. संमतीने पोटहिस्याचा सातबारा स्वतंत्र करायचा असेल, तर त्यासाठी तारीख निश्चित होईल आणि भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी गावात येऊन अर्ज स्वीकारतील. आठवडाभरात त्या अर्जांवर कार्यवाही होणार असून, सर्व हिस्सेदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र नकाशे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तहसीलदार सातबारा स्वतंत्र करतील. त्यासाठी नाममात्र १,००० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. मोजणीची आवश्‍यकता नसल्यास विना मोजणी सातबारा आणि स्वतंत्र नकाशे करून घेता येणार आहेत. या मोहिमेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असून, भांडणेदेखील थांबणार आहेत.

Post a Comment

0 Comments